तात्पर्य हरवलेली गोष्ट
एका अदृशाच्या दोरीवर वाळत पडलेली बिनदेहाची माणसे . नाव गाव यांचा आदिम शोध न लागलेली किंवा इच्छा असूनही शोध लावता न आलेली माणसे दोरीवर वाळत पडलेली असत . कुकरची शिट्टी ,कारखान्याचा भोंगा ,मोबाईलवरचे अलार्म क्लॉक अश्या लयबद्ध गोष्टीनी लय पकडली की दोरीवरची बिनदेहाची माणसे वारा आल्यासारखी उडून जात . स्वतःचे पाय असणारी घरे काहीजण त्यांना मोटार रेल्वे बस अस आपापल्या सोयीने काहीही म्हणत अश्या घरामधून ही माणसे बसल्याजागी उडून जात . पुन्हा दुसऱ्या एका अदृशाच्या दोरीवर वाळत पडत . एक स्थिती कायम राहत नाही असा वैश्विक नियम तेथे अजून जन्माला आला नव्हता किंवा तो नियमच आता काळबाह्य झाला होता . अश्याने जगण्यातले नाट्य देखील हरवले होते .तसे कुणाच्या जन्माचे कुणाच्या मरणाचे कुणी कुणाला तरी भेटल्याचे इवेन्ट साजरे होई तरीही जगण्यात नाट्य नव्हते . या माणसांच्या बिनदेहातून मनही अदृश्य झालेले असावे . जगण्यात विश्वाचे आदितत्व गवसल्यासारखे "गरजा गरजा " हा एकमेव उच्चार आणि त्याचा जयघोष करत ही ,माणसे जगत होती . कुणाच्याही गरजा कुणावर अवलंबून न राहिल्याने "पराधीन आहे जगती " असे कुणी कुणाला म्हणत नसे . आता हेच पहा ना सिंड्रेलाचे बूट तिथे कधीही हरवत नसत . हरवले तरी सिंड्रेला ते शोधण्यात तिचे मन उर्जा वेळ दवडत नसे . नवीन बूट विकत घेई . कारण तिला ठाऊक होते . हरवलेल्या बुटाचे पाय शोधत राजपुत्राचे दूत येणार नाहीत . राजपुत्राला तोपर्येंत दुसरी सिंड्रेला भेटलेली असेल ,तिचेच हरवलेले बूट आपण खरेदी करत असू . या माणसांना क्षितीज सापडले होते किंवा अंतराळ कारण एकावर एक चढलेल्या अजगराच्या सुस्तपणा सारखे रस्त्यांचे ओव्हरब्रीज यांच्या परिचयाचे होते त्यामुळे आकाश कशाला म्हणावे आणि जमीन कुणाला म्हणावे यांचा गोंधळ तुम्हाला आम्हाला वाटत असला तरी त्या माणसांना जाणवत नव्हता .
गोष्टी कथांमध्ये कसा सुखी राज्यात दबल्या पावलाने एखादा राक्षस येतो आणि परीला घेऊन जातो एखादा साधा भाबडा तरुण या परीला मुक्त करतो . अगदी तसेच या शहरात झाले . अज्ञाताची भेटवस्तू घेऊन कुणीतरी अज्ञात आला . त्याच्या वस्तूचे नाव वांग भोपळा घड्याळ मूर्ती असे काहीही असले तरी एक शहर उद्धवस्त करणारी घटना त्यावर लिहिली होती . वीजेवर चालणाऱ्या रेल्वेमध्ये तो घुसला . कधीही खंडित न होणारी वीज आज अचानक निघून गेली रेल्वे थांबली रेल्वेतून माणसे उतरली दुसऱ्या रेल्वेचा शोध घेण्यास निघाली अचानक घडत गेलेल्या बदलामुळे तो अज्ञात गडबडून गेला पुढचे काही क्षणातच तो आणि रेल्वे जमिनीखाली गुडूप झाले .विवर भूकंप किंवा अन्य काहीतरी भौगोलिक घटनेंत याला म्हंटले असू शकेल . त्याने उद्धवस्त करण्यासाठी आणलेल्या वस्तूचे काय झाले त्याचे काय झाले कोणाला ठाऊक नाही . दुसरेदिवशी सगळीकडे चर्चा मांडल्या जाऊ लागल्या प्रलय विश्वाचा शेवट जवळ आला आहे का वगैरे वगैरे . काळ आणि मन हरवलेल्या माणसांमध्ये काळ मन परत आला होता की नाही कोणास ठाऊक पण ही गोष्ट इथपर्येंतच याचे तात्पर्य शोधण्याची मुभा गोष्टीकाराने ऐकणार्यांना दिली आहे .
------कविता मोकाशी
------कविता मोकाशी
No comments:
Post a Comment