Pages

Monday, 20 October 2014

प्रेमभंगाचे दुःख

प्रेमभंगाचे दुःख 


"सॉरी मला तुझ्या भावनांचा आदर आहे पण मी तुझा नाही विचार करू शकणार ,तुला माझ्यापेक्षा चांगला जोडीदार मिळेल ,मी देवाकडे खूप प्रार्थना करेन तुझ्यासाठी ,पण मी तुला कोणत्या कारणासाठी नाही म्हणालो विचारू शकतेस तू मला "
"नाही ,मी नाही विचारणार " आवाजातली थरथर किंचित कमी करत ती म्हणाली 
"चल मी घरी सोडतो तुला " तो म्हणाला
" नाही नको मी जाईन एकटी ,तसेही आपण या जगात एकटेच असतो " किंचित शून्यात नजर लावून ती म्हणाली 

रात्रीच्यावेळी शहरात उंच असणाऱ्या दिव्यातून पडलेला प्रकाश अंगावर झेलत जाण तिला नेहमी आवडायचे ,निर्जन रस्त्यावर ती पावलांची झपझप कमी जास्त करून चालत रहायची तर घोड्यांच्या टापांचा आवाज करणारा घोडेस्वार त्या सिमेंटच्या रस्त्यावरून तिच्यापुढे जायचा .त्या घोड्याचा दूरवर शुभ्र ठिपका होईपर्येंत ती त्याकडे एकटक पहात रहायची . तिच्या मनातली एकेक छटा दूर व्हायची . तीच हृदय सावळस होऊन जायचे ती नेहमी घरी याच मंद क्षणाच्या आकाशातून पोहोचायची . आज तिला हे संथपण नकोसे वाटले . ऑटो पकडून ती घरी पोहोचली . रात्रीचे अकराचे ठोके टणटण वाजू लागले . ठीक बारा तासापूर्वी तिची स्वप्न निराळी होती आणि ठीक बारा तासानंतर स्वप्न पाहण्यासाठी तिला डोळेच नव्हते . डोळ्यातून पाणी ओघळत चालले होते . घर घराच्या भिंती ,भिंतीवरची राधाकृष्णाची पेटिंग डोळ्याच्या पाण्यात विरघळत चालले जणू अस्तित्व संपले होते प्रत्येकाचे . काहीवेळाने तिला रडता येईनासे झाले उसासे ओंजळीत भरू लागली . उसासे रिकामे ओंजळही रिकामी . गुढघा पोटात घेऊन बसून राहिली कित्येकवेळ आणि गार फरशीवर निजून गेली तशीच गुढघे पोटात घेवून ,जणू गर्भाच्या वाटेकडे तिचा प्रवास चालला होता . तिला नवा जन्म हवा होता 

ठीक बारा तास उलटून गेले सकाळचे अकरा वाजले होते . तिला हलक्याश्या जडपणाने जाग आली . दुःख विसरण्याचा एक मार्ग सापडला झोप घ्यायची भरपूर तिने स्वतःला धीर दिला . तिने मोबाईलकडे मोठ्या आशेने पाहिले त्याचा मेसेज मिसकॉल काहीच नाही . पुन्हा एक दुखरी कळ उठली . दाराजवळ लावलेली फेन्शुई आवाज करत राहिली किणकिण . तिने पिझ्झा ऑर्डर केला आणि टी व्ही सर्फिंग करत बसली कित्येकवेळ . टी व्ही वर आमिर खान म्हणत होता "सत्यमेव जयते ,सच्चा है प्यार मेरा " आमिर खान दुसऱ्या वाहिनीवर गाणे म्हणत होता "पेहला नशा पेहला खुमार " बातम्यांच्या गर्दीत टेलीमार्केटिंग सुरु होते . दुसऱ्या वाहिनीवर खुनाचा तपास सुरु होता . तिचे मन कुठेच रमेनासे झाले . देवाला विनवण्या करू लागली ,मी बोललेले सगळे नवस फेडेन पण तो माझ्या प्रेमाचा स्वीकार करू दे . बेल वाजली म्हणजे मनात आलेली इच्छा पूर्ण होते ती स्वतशीच हसली . पिझ्झावाला पिझ्झा देऊन गेला .

गच्चीतून येणारी जाणारी माणस निहाळत राहिली . बसस्टोपवर उभारून एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून बोलणारी जोडपी दिसली तिला एकाचवेळी त्यांचा राग आला आणि अपूप वाटले . तिने विचार केला काल त्याने म्हंटल होत "मी का नाही म्हणालो " कारण विचारू शकतेस . विचारायला हवे होते . कदाचित त्याचा काहीतरी प्रश्न अडीअडचणी असू शकतात . मी दूर करू शकले तर तो हो म्हणेल माझ्या प्रेमाला . पण कोणते कारण असावे ? उत्तराचा थांग लागत नव्हता . हा डोह दिसतो तितका साधा नाही खोल आहे अतिशय खोल आहे .मी वाकून पाहते तर माझे प्रतिबिंब दिसते . डोह म्हणतो प्रतिबिंब तुझेच आहे पण तू "ती" नाहीस . तू माझी नाहीस . मी तुझा नाही . मी याआधीच त्याच्यावर जीव ओवाळला आहे . त्याचे होकाराचे उत्तर मिळावे म्हणून पुन्हा ? त्याच वेदनेच्या गावावरून अनवाणी चालत जायचे ? नाही शक्य नाही . त्याच माझ्यावर प्रेम नाही .  पण त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल ?बसमधून जाताना त्याच तासनतास माझ्याकडे पाहण विसरू शकत नाही मी . रात्री रस्त्यावरून बाय walk चालत येताना शांत सहवासाच्यावेळी त्याने विचारलेले प्रश्न "प्रेम म्हणजे काय ? तू कधी केले आहेस कुणावर ? हे सार कस विसरू मी ? हे सारे क्षण म्हणजे एका आयुष्याने दुसऱ्या आयुष्यात धरलेली ओंजळ होती .

 प्रत्येक दहावीस मजली इमारतीच्या मागून मावळतीचे टोक गाठणाऱ्या सूर्याकडे ती पाहू लागली . कातरवेळ हुरहूर न सांगता घेवून येते . दरदरोज संध्याकाळ शिशिराचे ऋतू घेऊन येते शुभ्र मेघ झडून गेलेल्या पानासारखे आकाशात पाचोळा गर्दी करतात . जीवन गोठूनच जाते मग ही हूरहूर तरी कशी मागे राहते ? तिला मिळत असेल का पुनर्जन्म ? पुन्हा भाबडा आशावाद . काय हरकत आहे त्याचे कारण जाणून घ्यायला . त्याच्या फोनची रिंग वाजत राहिली उत्तर आले नाही . तिने पुन्हा फोन केला उत्तर आले नाही . त्याच्या मोबाईल वर पंधरा ते वीस मीस कॉल आले होते . त्याने मेसेज केला I am on bike call u later . तिला हायसे वाटले You call me later अस लिहिता आले असते त्याला पण त्याने स्वतहून फोन करतो असे सांगितले . पुन्हा कुठेतरी आशेचा किरण तिच्या मनात डोकावता झाला . 

त्याचा फोन आल्यावर तासभर बोलत राहिली आवडलेल्या पुस्तकांबद्दल ,चित्रपटाबद्दल गाण्याबद्दल तिने पुन्हा त्याला कारण विचारलेच नाही . तिला कधी माणसात जाण आवडायचेच नाही हरवली तर पुस्तकाच्या घरात हरवून जायची . तिथे हातातला लामण दिवा घेवून शोधत रहायची भिंतीवर रेखाटलेली माणसे . या घराला कधी पोफडे येत नसत वाळवी लागत नसे . खऱ्या माणसांपेक्षा ही माणसे भावनांनी ओतप्रोत भरलेली वाटायची . या कुणाच्यातरी मनातल्या कल्पना म्हणजे कुठेतरी अवतरलेले वास्तव असते याची बिचारीला जाणीव नसायची .कथा कादंबर्यातले प्रेम तिला खऱ्या जगण्यात आणायचे होते . त्याच्याशी फोनवर कथेतले पात्र समजूनच बोलत राहिली . काहीवेळाने फोन ठेवून दिला . आभाळात चांदणे भरून आले होते एव्हाना . कितीतरी दिवसात आपण भरतकाम केले नाही ,तिच्या लक्षात आले . सुई दोरा घेऊन भरतकाम विणू लागली . निळ्या रंगाचा पक्षी आणि त्याची निळी सावली . भरतकाम करता करता कितीदा सुई बोटात टोचली गेली अंदाजच नव्हता . आकाशही क्रोशाचे ढग घेऊन चांदणे विणत बसलेले 

हा आजचा दिवस बुडाला ती मनाशी म्हणाली तिने दिवे मालवले पण हाच दिवस ती कित्येक महिने जगत राहिली नोकरीला कधी आठ दिवसांची कधी पंधरा दिवसाची आणि आता तर महिन्याभराची सुट्टी घेतली . तिचे रुटीन ठरलेले होते रात्री अकराच्या ठोक्याला झोपायचे सकाळी अकराच्या ठोक्याला उठायचे हॉटेलचे जेवण मागवायचे चित्रपट पहायचा पुस्तक वाचायचे संध्याकाळी त्याला न चुकता फोन करायचा सहजच केला म्हणायचे . कसा आहेस छान ना असाच आनंदी रहा सहजच फोन ठेवून द्यायचे रात्रीच्या जेवणावर फुली भरतकाम करत रिते मन भरत रहायचे .

एकदिवस अचानक खूप पाऊस पडला तिने तिच्याजवळच्या सर्व कागदांच्या होड्या केल्या . वाहत्या पाण्याऐवजी वाहत चाललेल्या होड्यांनी दृश्य सजून जाते . ती मनाशी ठरवते खूप झाले दुःख साजरे करणे . जगात कधी कुणी प्रेमच करत नाही का ? एकदा प्रेम केले म्हणजे पुन्हा प्रेम करता येत नाही का ?त्याच्या न मिळालेल्या प्रेमासाठी आपण आपल्या आयुष्याहून का वेगळे व्हायचे . जिथे कवडसा दिसेल तिथे पाऊल ठेवता आले पाहिजे . मोगरीच्या सुगंधाला देखील लय असते ती पकडता आली पाहिजे .मला उथळ जगणे कधीच आवडत नाही पण हा निराशेचा गर्त तरी का कवटाळायचा  ?मी हा कोश ओलांडला पाहिजे .मला माझ जगण जगायचे आहे .पाऊस ओसरून गेला  . पाऊस थांबून खूपवेळ झाला होता ती अतिशय कमालीची शांत झाली होती . गेल्या कित्येक दिवसात अशी शांतता मनाला लाभली नव्हती . तिने दिवे मालवले बऱ्याचश्या लवकर निजून गेली

 पहाटे लवकर उठून मंदिरातल्या घंटेचा नाद ऐकला . गच्चीतल्या तिच्या आवडत्या फुलांशी गुजगप्पा केल्या . आवडता नाष्टा उडीद डाळ घातलेले उप्पीट केले . तिचा आवडता हिरवा रंग त्या रंगाचा ड्रेस घातला . केस भुरूभुरू उडविले आणि दुचाकीवर मस्त वेग अनुभवत चालली . सगळ्या बाजारपेठा पालथ्या घातल्या आणि पुष्कळ खरेदी केली . घरासाठी स्वतःसाठी . नवीन ज्वेलरी नवीन ड्रेस नवीन हेअरस्टाईल सगळ काही बदलून गेले क्षणात . कॉफीतला चमचा गोल ढवळत ठेवत ती विचार करू लागली . छान असत अस कधी कधी स्वतःच स्वतःला भेटण . त्या मॉलमधून ती बाहेर पडू पाहत असतानाच टरो कार्ड रीडरने तिला बोलावले आणि भाकीत केले तुम्ही लवकरच प्रेमात पडणार आहात . ती आनंदून हातातल्या पिशव्यांचे ओझे घेऊन सरकत्या जिन्यावरून खाली येतानाच तिला तो दिसला तो दुसऱ्या बाजूस जिना चढून वर जात होता . ओळखीचे हसू संभाषणाचा हलवता हात दोघांनी केला . ती त्याला थांब म्हणाली नाही आणि ती थांबली देखील नाही . ती खाली येऊन पोहोचली तो वरच्या मजल्यातून तिला पाठमोरी निहाळत राहिला . त्याने आपल्याला नकार का दिला ? विचारायचे राहूनच गेले .ती मनाशी म्हणाली . तिने भूतकाळाकडे पाठ केली आणि टरो कार्ड रीडरचे भविष्य मनाशी गुंफवू लागली  मी पुन्हा प्रेमात पडणार . स्वतःशीच वेडे हसू लागली आणि घरी परतली तिच्या आवडत्या उंच दिव्याच्या प्रकाशातून चालत . तिच्यामागून येणाऱ्या शुभ्र घोड्याला ठिपका होईपर्येंत पाहू लागली अनासक्त चांदण्यासारखे 


-------कविता मोकाशी 

No comments:

Post a Comment